Sunday, September 20, 2009

स्थलांतराचा धार्मिक संदर्भ


स्थलांतरीतांच्या प्रश्नाला प्रांतिक किंवा भाषक संदर्भच नसतात. त्याला धार्मिक संदर्भही बराच आहे. आपल्या देशात बांगलादेशातून होणारे स्थलांतरही याच सदरात मोडते. बांगलादेशीय मुस्लिमांच्या आसाममधील वाढत्या संख्येने तिथे जातीय दंगली पेटल्याचा इतिहासही ताजाच आहे. अधून मधून ही धुसफुस पुन्हा डोके वर काढते. पण त्यापलीकडे जाऊनही भारतात धार्मिक स्थलांतराचा प्रश्न अजूनही म्हणावा तितका गंभीर नाही. (किंवा आपण तो घेतला नाही, असंही असू शकेल.)

पण युरोपात मात्र या धार्मिक आणि स्पष्टपणे सांगायचे तर मुस्लिमांच्या स्थलांतराने मोठीच अस्वस्थता निर्माण झाली आहे. भारतात मुस्लिम आले त्याला हजार वर्षे झाली. राज्यकर्ता बनलेली ही जमात भारतात मोठ्या प्रमाणात रूजली. फळली. वाढली. बर्‍यापैकी मुरलीही. तरीही हिंदू आणि मुस्लिमांमध्ये एक अदृश्य तणाव राहिलेलाच आहे. अधून मधून तो दिसूनही येतो. पण तरीही मुस्लिमांचा निःसंशय प्रभाव इथल्याही जनजीवनावरही पडला आहे. भांडणं, दंगली होत असल्या तरी दोन्ही धर्मियांचे प्रमाण पाहता परिस्थिती हाताबाहेर गेलेली दिसत नाही. 'यादवी' माजणे काही घडले नाही. सांस्कृतिक बाबतीत तर उभय धर्मियांनी बरेच मोठे योगदान दिले आहे. त्यामुळेही असेल कदाचित संबंध फार काही ताणले गेलेले नाहीत.

मुस्लिमांच्या शांततामय आणि आक्रमक अशा विस्तारातूनही पूर्ण भारत मुस्लिम झाला नाही. पण तरीही फाळणीतून पाकिस्तान आणि पुन्हा बांगलादेश असे दोन 'मुस्लिम' देश निर्माण झाले खरे. त्यानंतर राहिलेल्या भारतातही मोठ्या प्रमाणात मुस्लिम जनसंख्या राहिली. पण त्यातून त्यांचे वेगळे राज्य, देश अशी मागणी आकाराला आली नाही. राहिलेल्या मुस्लिमांनी कदाचित ही भूमी आपली मानली असावी आणि मुस्लिमांचे आपल्यात असणे हिंदूंनीही मान्य केले असावेत. पण विसाव्या शतकापूर्वी मुस्लिमांचे अस्तित्वही फारसे नसलेल्या युरोपात मात्र त्या शतकात आलेल्या मुस्लिमांमुळे बरीच अस्वस्थता पसरली आहे.
ख्रिस्तोफर काल्डवेल नावाच्या एका अमेरिकन पत्रकाराने याच विषयावर आधारीत 'रिफ्लेक्शन्स ऑफ द रिव्होल्युशन इन युरोपः इमिग्रेशन, इस्लाम अँड द वेस्ट' या नावाचे पुस्तक लिहिले आहे. इकॉनॉमिस्टमध्ये त्याचे परिक्षणही आले आहे. त्यावरून या अस्वस्थतेचा अंदाज येतो. मुस्लिमांच्या युरोपात येण्याने काय घडलंय आणि का घडलंय याची मीमांसा त्याने केली आहे.


युरोपात छोट्या छोट्या नोकर्‍यांची गरज होती, म्हणून दरवाजे उघडे ठेवले गेले. त्यातून मोठ्या प्रमाणात लोक येत गेले. पुढे नोकर्‍या संपल्या तरीही लोकांचे येणे काही थांबले नाही आणि आलेले लोक काही परत गेले नाही. उलट त्यांच्यामुळे त्यांची लोकसंख्या वाढली. म्हणूनच युरोपातील देशांत स्थलांतरीतांची संख्या किमान दहा टक्के तरी आहे. त्यातही मुस्लिमांची जास्तच. त्यातही मोठ्या शहरांत हे प्रमाण ३० टक्के आहे. हे मुस्लिम या देशांत आले ते प्रामुख्याने आशिया आणि आफ्रिकेतून. पण ते भारतात जसे मिसळले तसे तिकडे मिसळले गेले नाहीत. (भारतात स्थानिकांमध्ये झालेल्या धर्मप्रसारामुळे कदाचित स्थानिकांपेक्षा ते वेगळे वाटतही नसतील.) त्यांच्या न मिसळण्याला 'इस्लाम' हा शब्द कारणीभूत असावा असा काल्डवेलचा तर्क आहे. इस्लामची शिकवण, राहणीमान इतर धर्मांपेक्षा त्यांना वेगळे रहाण्यास, वागण्यास भाग पाडत असल्याने ते स्थानिकांत मिसळत नाहीत. परिणामी त्यांची स्वतंत्र ओळख तयार होते. अस्मिता निर्माण होते.

त्यांच्यासाठी आता युरोपीय देशांना वेगळे कायदे करावे लागत आहेत. त्यांचे प्रश्न समजून घेऊन त्यांच्या धर्मांतर्गत असलेल्या न्यायनिवाड्याचा आधार त्यांना घेऊन द्यावा यासाठी तिथल्या न्यायव्यवस्थांवर दबाव वाढत आहे. फ्रान्समध्ये दाढी आणि पगडी ठेवण्यास सरकारचा प्रतिबंध हे त्याचे उदाहरण. पण आणखी एका उदाहरणात लग्नावेळी आपली बायको कुमारी नव्हती, म्हणून एका मुस्लिम व्यक्तीने विवाह रद्द ठरवावा असा अर्ज न्यायालयात दिला. यावर फ्रान्सच्या कायद्यात काहीही तरतूद नाही. तिथे काय करणार? इतकंच नव्हे तर ब्रिटनमध्ये पेन्शनविषयक लाभ नवर्‍याच्या 'इतरही बायकांना' मिळावेत यासाठी विशेष व्यवस्था करावी लागली आहे. याशिवायही अनेक कायदे नव्याने करावे लागत आहेत किंवा आहे त्यात दुरूस्ती करावी लागत आहेत. या सगळ्या गोष्टी पहाता, स्थलांतरीत मुस्लिमांसाठी आपल्या देशाने झुकणे हे स्थानिकांना त्रासदायक वाटत आहे.

स्थलांतरीतांविरूद्धच्या युरोपातील भावना आता इतक्या तीव्र झाल्या आहेत की फक्त १९ टक्के लोकांना स्थलांतर हे आपल्या देशाच्या हिताचे वाटते आहे, तर ५७ टक्के लोकांना आपल्या देशात उपर्‍यांची संख्या वाढली आहे असे वाटते. युरोपातल्या नोकर्‍यांमध्येही ही मंडळी शिरली आहेत. त्यामुळे स्थानिक विरूद्ध उपरे हा संघर्षही तीव्र झाला आहे. तिकडेही 'राज ठाकरे' उभे ठाकू लागले आहेत. टोनी ब्लेयर आणि जॅक स्ट्रॉ यांनी तर बुरखा हा फुटिरवादी मानसिकतेचे प्रतिक असल्याचे म्हटले होते. या स्थलांतराला आणखी एक मुद्दा आहे. युरोपातील लोकसंख्या अधिकाधिक वृद्द होत चालली आहेत. पण स्थलांतरीत मुस्लिमांची कुटुंबे मोठी असल्याने युवा भरपूर आहेत. त्यामुळे उद्या युरोपात मुस्लिमांचे वर्चस्व निर्माण झाले तर आश्चर्य वाटायला नको ही भीतीही या मुळाशी आहे.


काल्वडेलने त्याच्या पुस्तकात हे सगळे मुद्दे मांडले आहेत. पुस्तक नक्कीच वादग्रस्त आहे. ते मीही वाचलेले नाही. पण त्याच्या इकॉनॉमिस्टवरील परिक्षणावरून आणि त्याखाली आलेल्या प्रतिक्रियातूनही त्याची झलक मिळतेच. तुम्हाला या सगळ्यविषयी काय वाटते. तुम्ही कुणी हे पुस्तक वाचलेय काय? किंवा तुम्ही युरोपात किंवा इतरत्र रहात असलात तर तुमचा अनुभव काय आहे?


इकॉनॉमिस्टमधील मूळ परिक्षण-
http://www.economist.com/books/displaystory.cfm?story_id=14302290

No comments: