Friday, March 26, 2010

सावध ऐका (मागल्या) हाका!

पदार्थाची चव लिहून सांगता येत नाही, तो अनुभवाचा भाग आहे, तद्वतः इंदूरी हाकांचे विश्व हा खास अनुभवाचाच भाग आहे. आता लेखाची सुरवातच खाद्यपदार्थाच्या शब्दाने व्हावी हा खास इंदुरी असल्याचा अपरिहार्य नि अटळ परिणाम आहे. पण तो अट्टल खवय्या असल्याची साक्षही आहे. इंदुरात आल्यावरही इथल्या हाकांमध्ये भिजले नाहीत नि त्या हाका तुमच्या जिभेत भिजल्या नाहीत, तर तुम्ही 'इंदौरकर' कधीच होऊ शकणार नाही. इथल्या भय्याचा उच्चार तुम्ही कोणत्या वेळी, कोणासमोर नि कसा करता यावरही तुम्ही इंदौरी आहात की नाही हे ठरते. सबब, यापुढे कधीही इंदूरला आल्यास हा दिलेला गृहपाठ केल्याशिवाय येऊ नये असा खास सल्ला दिल्याशिवाय रहावत नाही.

आता हेच पहा ना. एरवी भाऊ असा सरळ सोपा नि साधा अर्थ असलेल्या भय्या या हिंदीभाषक शब्दाचे 'नवनिर्माण' झाल्याचे आपण पहातो आहोतच. भय्या या संबोधनात 'बिहार' नि 'उत्तर प्रदेश'च सामावल्याचे दिसते. पण मध्य देशी आल्यानंतर मात्र भय्यात किती विश्व सामावले आहे, याचा अंदाज येतो.

एरवी आपल्याकडे अपरिचित, अल्पपरिचित मंडळींना हाक मारण्यासाठी काका, मामा, दादा, भाऊ, अप्पा, अण्णा, ताई, काकू, मावशी, मामी या शब्दांची रास आहे. अगदीच गेला बाजार 'अहो, शूक शूक तुम्ही तुम्ही' यानेही काम भागते. पण भय्यासारखा सर्वव्यापी शब्द मात्र आपल्याकडे नाही. दादा, भाऊमध्ये ती सर नाही. याउलट भय्यांत किती छटा लपल्यात म्हणून सांगू? नुसती हाक म्हणून, आदर म्हणून, नातं आड आलं म्हणून, नातं आड यावं म्हणून, नुसता 'आड' आला म्हणून हा शब्द बाहेर पडतोच. पण राग-चीड-द्वेष- हिणविणे या आणि अशा अनेक भावनांत बुडूनही हा शब्द तोंडातून 'फुटतो'. पण या शब्दांतल्या भावनांचा अदमास त्याचे उच्चारण समजून कळल्याशिवाय तुम्ही इंदौरात रूळलात असे म्हणताच येणार नाही, महाराजा.

आता तुम्ही इथल्या कुठल्याही चांगल्या-चुंगल्या दुकानात खरेदीला गेलात तर हाच शब्द 'भय्या, जरा वो कपडा दे ना'. म्हणून सोज्वळ रूप धारण करतो. रस्त्यावरच्या पोहेवाल्याकडे, पाणीपुरीच्या ठेलेवाल्याकडे, गल्लीत आलेल्या तरकारीवाल्याकडे नि पानटपरीत राजेशाही थाटात बसलेल्या पानवाल्याकडे हाच शब्द विठ्ठलाला 'विठू' म्हणावे अशा लयदार पद्धतीने 'भिया' असा प्रेमळ होतो. इथल्या ब्ल्यू लाईन बसमध्ये बसून कुठे चालले असलात की त्यातला 'भय्याही' प्रेमळ असतो. पण बस 'नगरसेवा' (खासगी वाहतुकदाराची) असेल तर मग त्यातल्या तिकीटफाडू पंटरच्या तोंडून आपला उच्चार 'भियाव, जरा खिसको ना' असा भ्यावणारा झाल्यास भिऊन जायचे कारण नाही. ही इंदूरी त्र्यागाची 'भियाव' आवृत्ती असते. पण ती इतक्यावरच थांबत नाही. भर ट्रॅफीकमध्ये कुणी धडक मारल्यानंतर झालेल्या भांडणातही हा 'भिया'च कामी येतो. 'भिया, गाडी चला रिया या क्या कर रिया था? या वाक्यासरशी दोन भियातले भांडण पुढे कितीही काळ रंगू शकते. रस्त्यात चालता-चालता किंवा चालवता चालवता तुमचा 'ओ भिया हटो ना' असा उद्धार झाल्याशिवाय तुम्ही इंदुरात असल्याचा फिल अजिबात येणार नाही. शब्द साधा 'भिया' असला तरी त्याच्या उच्चारणाची न्यारी ढब तो 'फिल' नक्कीच देईल.

नात्या-गोत्यातही भय्या असतोच. पण अनेकदा नाती निर्माण करताना तो गोत्यातही आणतो. समवयस्क मुलाला हाक मारताना नाव घेऊन पुढे भय्या लावण्याची ही प्रथा अनेक पोरीबाळींसाठी सोयीची ठरत असली तरी त्या 'भय्या'चा मात्र 'वडा' होतो. पण वय वाढल्याचं अनुक्रमे तुमचे डोईवरचे केस 'दिसत नसल्यासारखे' झाल्यास वा ते पांढर्‍या रंगाला पर्याय ठरल्याचे वाटताक्षणी तुम्ही 'भाईसाब' म्हणून 'कन्व्हर्ट' होता ते तुमचं तुम्हालाही कधी कळत नाही. भाई या खास हिंदी शब्दाची मुंबई आवृत्ती इथे वापरात नाही, पण त्याचा मूळ अर्थ पकडूनही हा शब्द केवळ नातेनिदर्शक एवढाच उरला आहे. गेला बाजार अगदीच सार्वजनिक कार्यक्रमात आदरार्थी उच्चार म्हणून 'भाई प्रवीणजी', 'भाई दिलीपजी' असे ऐकायला येते. पण तो शब्द जपून ठेवायचा म्हणूनच. बाकी काही नाही.

समवयस्क विवाहित महिला आपल्याकडे वहिनी असतात, इकडे त्यांचे कन्वर्जन 'भाभी' किंवा 'भाभीजीं' मध्ये होत असले तरी त्याहीपेक्षा 'बेहेनजी' ही खास इथली साद ऐकण्यासारखी असते. बायकांचे कपडे विकणार्‍या दुकानात याचा वापर बराच होतो. पण त्यातही गिर्‍हाईक गटवायचे या भावनेने पेटलेला दुकानदार 'दिदी दिदी' म्हणूनही रूंजी घालत बसतो. पण हल्ली त्याही पलीकडे 'मेडम' हा शब्द रूळलाय. विशेषतः सहकारी किंवा अनोळखी महिलांसाठी. सायकलवरून जाणाराही समोर स्कूटी घेऊन जाणार्‍या महिलेला 'मेडम, जरा हटो', किंवा गाडी ठोकल्यास, 'ओ मेडम केसे गाडी चला रही हो', म्हणून पुकारा करेल. काही ठिकाणी या 'मेडम'च्या पुढे 'जी' जोडून भिजलेला आदर दर्शवला जाईल. लिखित भाषेत ही मेडम 'मैडम' अशी अंमळ वाकल्यासारखी दिसते.

आपल्याकडचे 'काका-काकू' इकडे 'अंकल-आंटी' म्हणून उरलेत. त्यामुळे थोड्या मोठ्या पुरूषांना अंकल नि बायकांना आंटी असा सर्रास उच्चार आहे. त्यामुळेच की काय कुणीही 'सोळावं वरिस' ओलांडलेली कन्या अस्मादिकांच्या माथ्यापर्यंत रूंदावलेल्या विस्तीर्ण भालप्रदेशाकडे पाहून 'अंकल' म्हणते तेव्हा तोपर्यंत अभिमानाने उंचावलेले मोजके चार केसही मान टाकतात. पण कधी तरी वाहतुकीच्या भर गर्दीत कॉलेज कन्यकांचा अडसर होत असला की 'आंटी, बाजू हटो' म्हणून कधीचा तरी सूड कुठे तरी नि केव्हा तरी अखेर उगविण्याची संधी मिळते. उगाचच 'आंटी' संबोधून समोरचीच्या चेहर्‍यावरचे बदलते भाव पाहून, त्याला अजिबात भाव न देण्याइतकी इंदौरची नवी पिढी सोकावलीय. पण तरीही 'आंटी मत कहो ना, असा लाडीक स्वर सहसा कुठे ऐकल्याचे आठवत नाही. एकुणात सध्या या अंकल नि आंटीचा आख्ख्या इंदौरमध्ये उच्छाद आहे.

दुकानदारी भाषेतले काही शब्दही खास आहेत. आपला माणूस इथे 'अपना आदमी' होतो, पण त्याहीपेक्षा 'अपना बंदा आएगा, सम्हलके लेना' हा उल्लेख खास इथला आहे. हा 'बंदा रूपया' इथल्या व्यावसायिक कट्ट्यावर टण्णकन आवाजानिशी आदळला नाही, तरच नवल. मग त्याच धरतीवर कधी कधी 'मुलींचा' उल्लेखही चक्क 'बंदी' असाही होऊन जातो. एखाद्या 'चाय'च्या 'गुमटी'वर गेल्यास तिथल्या 'पिंट्या'ला 'बालक' होतो. 'ए बालक, इधर आ' अशी हाक आपसूक निघून जाते.

आणि हो, इकडे आलात तर महाराष्ट्रातली मराठी शब्दांचे हिंदी भाषांतर करून बोलण्याची सवय सोडून दिलेलीच बरी. एरवी मराठी धाटणीचेच भाषांतरीत हिंदी रेटून नेऊन बोलण्याच्या मराठी सवयीला असाच योगायोगाने चाप बसला. आमचा एक मित्र खरेदीसाठी कपडा बाजारात गेला. खरेदी करता करता त्याने 'काका' या मराठी शब्दाचं भाषांतर करून 'चाचा, कुछ किमत कम करो' असं फर्मान सोडलं. झालं. समोरच्या दुकानदाराचं टाळकं सणकलं. चाचा? संतापून तो म्हणाला? मै क्या चाचा दिखता हूँ' इकडे मित्र गार. त्याला कळेचना. हा का चिडला ते? दुकानदाराचा संताप गळणे सुरूच, ' आपने दुकान नहीं देखी? महावीरजी का फोटो नही देखा? बाकी सारे जैन मुनियोंके फोटो नहीं देखें' तरीही मित्राचा डोक्यात काही शिरेचना. त्याने विचारलेच, लेकिन मैने गलत क्या कहा? तोपर्यंत त्या दुकानदाराला अंदाज आलेला की 'बेणं' बाहेरचं दिसतंय. तो म्हणाला, भाईसाब, यहॉं चाचा मतलब मुसलमान आदमी को बोलते है. मै जैन हूँ. समझे? मित्राच्या ज्ञानात भर पडली. शिवाय नको तिथे संबोधनांचे भाषांतर करणे टाळा हा धडा मिळाला.

हे झाले हिंदी बांधवांचे. आपल्या मराठमोळ्या मंडळींही 'सावध ऐका पुढल्या हाका' अशीच आहेत. इथल्या मराठी बांधवांची हिंदीवगुंठीत मराठी नात्यांची संबोधने जणू सराफ्यातल्या रसोत्पादीत जिलेबीचा थाट घेऊन तोंडातून टपकतात. आणि मग 'काका, मावशी के लिए मेसेज है', काकू आपको आईने हल्दीकुंकू के लिए बुलाया है'. 'मामा, तुम मामी को लेकर आओ, मैं आजी के साथ हूँ ही हिंदीच्या पुडीतली मराठी संबोधने ऐकायलाही मजा येते.

आताशा ही संबोधने आमच्याही 'कानवळणी' पडलीत. या संबोधनातली वळणेही आता जाणवू लागली आहेत नि त्याला प्रत्त्युतर करण्याची भाषाही आडवळणाने का होईना समजू लागली आहे. म्हणूनच रस्त्यावर सवयीप्रमाणे मध्येच गाडी घालून रस्ता तयार करण्याची खास इंदौरी प्रथा पाळणारा गाडीस्वार आला, की 'ए भिया, गाडी चला रिया, या हवाई ज्यहाज', अशी इंदौरी भाषा तोंडातून बाहेर पडल्याशिवाय चैन पडत नाही.

आमच्या इंदौरी झाल्याचा आणखी काय पुरावा द्यायला हवा काय? चला भय्या, थांबतो आता, सराफ्यात जाईन म्हणतो.

Monday, February 1, 2010

'मराठी' म्हणजे नेमके कोण?

मुंबई कुणाची या मुद्यावरून शिवसेना आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ तसेच त्यांची राजकीय शाखा असलेल्या भाजपमध्ये कलगीतुरा रंगलेला असतानाच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आणि 'मराठी ह्रदयसम्राट' राज ठाकरे यांनी षण्मुखानंद सभागृहात मराठी म्हणजे कोण याची व्याख्याच जाहिर केली. राज यांची ही व्याख्या म्हणजे त्यांच्या वैचारीक गोंधळाचे नवे टोक आहे.

राज यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्थापनेवेळी शिवाजी पार्कवर घेतलेल्या सभेत मराठीची व्याख्या अशी केली होती. 'छत्रपती शिवाजी महाराज की जय असे म्हटलं की आपसुक 'जय' असं म्हणतो तो मराठी. ज्ञानेश्वरांपासून ते कुसुमाग्रजापर्यंत कवींच्या रचना तल्लीनतेने वाचतो तो मराठी'. ही व्याख्या बर्‍याच प्रमाणात व्यापक असल्याने महाराष्ट्रात रहाणारा आणि न राहाणारा पण मराठी भाषा, संस्कृती यांच्यावर प्रेम करणारा, आदर बाळगणारा नि अंगीकारणाराही त्यात येत होता. पण नव्या व्याख्येने मात्र अनेकांना मराठीच्या परिघातून खड्यासारखे दूर ढकलले आहे.

राज यांच्या नव्या व्याख्येनुसार 'जन्माने मराठी तोच मराठी. त्यामुळे नोकर्‍या त्यालाच मिळायला हव्यात. केवळ बोलता, लिहिता नि वाचता येते म्हणून त्याला मराठी म्हणता येणार नाही.' याचा अर्थ आत्तापर्यंत महाराष्ट्रात दीर्घकाळापासून आलेल्या परप्रांतीयांनी इथली भाषा, संस्कृती आत्मसात केली तरीही त्यांचा केवळ जन्म इथला नाही म्हणून त्यांना मराठी म्हणता येणार नाही?

जन्माने मराठी या शब्दातून राज यांना नेमके काय म्हणायचे आहे? ज्याचा जन्म महाराष्ट्रात झाला आहे तो मराठी की जो मराठी आडनावाच्या घरात जन्माला आहे तो मराठी? या प्रश्नाचा पूर्वार्ध लक्षात घेतला तर महाराष्ट्राबाहेर परभाषेच्या सानिध्यातही मराठी भाषेचा झेंडा डौलाने फडकवत ठेवणारी मंडळी मराठी ठरत नाहीत! ती महाराष्ट्रात आली तरीही ती मराठी ठरत नाहीत. शिवरायांच्या काळापासून दक्षिणेत गेलेली नि पेशव्यांच्या काळात उत्तर दिग्विजय केलेल्या मंडळींना
तीनशे-साडेतीनशे वर्षानंतर महाराष्ट्रात स्थान नाही, असा याचा अर्थ घ्यावा काय?

राज यांना असे म्हणायचे नसेल तर मग केवळ मराठी आडनावाच्या घरात जन्माला आला म्हणून तो मराठी हा निकष लावायाचा झाल्यास इथल्या भूमीशी एकरूप होऊन, त्यावर नांदणारी भाषा, संस्कृती आपलीशी करणारे गुजराती, मारवाडी काही प्रमाणात दाक्षिणात्यही यांना मराठी म्हणताच येणार नाही. मराठी साहित्यात मोलाची भर घालणारे ज्येष्ठ समीक्षक शंकर सारडा, लेखिका सुरेखा शहा, व्यावसायिक धूत कुटुंबिय, विदर्भातील शेतकर्‍यांच्या विधवांसाठी आंदोलन उभारणारे किशोर तिवारी यांच्यासारखी अमराठी मंडळी मराठी ठरणारच नाहीत. इतकेच काय पण मराठी अस्मितेचे प्रतीक असणारे छत्रपती शिवाजी महाराजही राजस्थानच्या सिसोदीया वंशातीलच होते, मग त्यांनाही आणि त्यांच्या वंशजांनाही मराठी म्हणता येणार नाही.

बाहेरून महाराष्ट्रात येणार्‍या मंडळींनी मराठी भाषेचा, संस्कृतीचा आदर करायला हवा. ती शिकायला हवी आणि अंगीकारयलाही हवी, हा आग्रह असल्याचे राज यांच्या आतापर्यंतच्या आंदोलनातून दिसून येत होते. पण एवढे करूनही ती व्यक्ती मराठी ठरणार नाही, असे सांगून आता राज यांनी त्या मंडळींची आणखी कोंडी केली आहे. यापैकी जी मंडळी मराठी तुच्छ मानून आपल्याच भाषेचा आडमुठा अभिमान बाळगत होती, त्यांना असलेला राज यांचा विरोध किमान समर्थनीय तरी होता. पण आता मात्र, मराठी बोलायला, लिहायला नि वाचायला शिकूनही एखादी अमराठी व्यक्ती मराठी ठरणार नसेल तर मग तो कोणत्या मार्गाने मराठी ठरेल हे तरी आता राज यांनी जाहीर करायला हवे.

या व्याख्येतून राज यांना महाराष्ट्रात अमराठी लोक अजिबात नको आहेत, हेच ध्वनित होते आहे किंवा महाराष्ट्रातल्या सर्व नोकर्‍या मराठी आडनावाच्या मुलांनाच मिळायला हव्यात, असा त्यांचा आग्रह दिसून येतो. पण त्यासाठी जी व्याख्या केली ती मात्र अनेकांवर अन्याय करणारी आहेच, पण त्यांच्या आतापर्यंतच्या आंदोलनातील निरर्थकत्व स्पष्ट करणारी आहे.