काही दिवसांपूर्वी ऑस्ट्रियातील एक बापाने आपल्या मुलीला २६ वर्षे घरात कोंडून तिच्याशी शरीरसंबंध जोडून संतती उत्पन्न केली होती, असे उघडकीस आले होते. त्यावेळी पाश्चात्य जगात घडलेला प्रकार म्हणून आपण त्याकडे काहीशा तटस्थ नजरेने त्याकडे पाहिले. मध्यंतरी एका व्यक्तीने इंटरनेटवर आपल्या व्यभिचारी पत्नीलाच विकायला ठेवण्याचीही बातमी आपण वाचली. त्यावेळीही असे प्रकार पाश्चात्य जगात घडतात. म्हणून आपण स्वस्थ बसलो. पण दिल्लीचे आरूषी हत्याकांड असो वा मुंबईत झालेली नीरज ग्रोव्हर या तरूणाची त्याच्या मैत्रिणीच्या प्रियकराने केलेली हत्या (त्यात केलेले मृतहेहाचे तीनशे तुकडे!) या बातम्या एकामागोमाग आपल्यासमोर येऊन आदळल्या आणि समाजमन ढवळून निघाले. हे का घडले असेल?
वर वर पाहून या प्रश्नाचे उत्तर मिळणार नाही. त्यासाठी या घटनांच्या तळाशी जायला हवे. वेगवान आणि चंगळवादी जीवनशैलीने जगण्याचे हेतू बदलले आहेत. जगायचं कशासाठी तर पैशांसाठी अशी एक नवी संकल्पना रूजली आहे. पैशांसाठी जगायचं असेल तर चांगलं करीयर हवं. त्यासाठी मेहनत घ्यायचीही या पिढीची तयारी आहे. पण या मेहनतीला नैतिकतेची कुंपणे मानवत नाही. म्हणूनच कुठली कर्नाटकातील मारिया सुशायराज ही अभिनेत्री काम मिळविण्यासाठी एकट्याच्या बळावर मुंबईत येते. काम मिळविण्याचा 'राजमार्ग' तिला माहिती आहे. तो सिनर्जी एडलॅब्जचा क्रिएटिव्ह हेड नीरज ग्रोव्हर याने दाखवून दिला होता. त्यामुळे आधी कुणा एकाशी प्रेमसंबंध असलेली मारीय पटकन काम मिळविण्यासाठी ग्रोव्हरबरोबर सर्रास रहायलाही तयार का झाली? हे अधःपतन कसे झाले असेल? किमान आपल्या अटींवर, मुल्यांवर करीयर करावे तिला कधीच वाटले नसेल का? पैसा, प्रतिष्ठा आणि यश तिला आपल्या शीलसंपन्न जगण्यापेक्षा महत्त्वाचे वाटले असेल का? तिच्यावरचे संस्कार त्यावेळी कुठे गेले असतील?
तीच गोष्ट नीरजची. एक यशस्वी व्यक्ती असलेल्या नीरजच्या आयुष्यात मुल्यांना, संस्कारांना काहीच स्थान नव्हते? 'स्ट्रगलर' म्हणून आलेल्या मुलीशी 'अफेअर' करून, तिच्याकडून हवे ते मिळवून घेऊन तिला करीयरमध्ये 'ब्रेक' मिळवून देताना आपण कुठेतरी मुल्यांशी प्रतारणा करतोय असे त्याला वाटले नसेल? शरीरसुख हेच ध्येय त्याने समोर ठेवले असेल?
मारियाचा प्रियकर एलिम जेरॉम मॅथ्यू हा तर नौदलातला अधिकारी. पण आपली प्रेयसी ही आपलीच असेल दुसर्या कुणाचीही नाही, ही मालिका भावना अगदी मनात घट्ट रूजलेला हा तरूण. मारीयाशी आदल्या रात्री बोलणे झाल्यानंतर संशय येऊन तो तातडीने मुंबईत आला सकाळी मारियाच्या घरी जाऊन त्याने नीरजचा खून केला. केवळ मारीयावरील मालकी हक्क त्याच्यातील हिंसेला एवढी उत्तेजना देऊ शकतो? त्याच्यातला पुरूषप्रधान संस्कृतीच्या वर्चस्वाचा प्रतिनिधी आपल्या प्रेयसीच्या दुसर्या एका प्रियकराला संपवून टाकण्यापर्यंत जातो. हे असे कसे घडते? आणि त्याचवेळी मारीया शांतपणे काहीही विरोध न करता त्याच्याकडे पहात असते. त्याला मृतदेहाचे तीनशे तुकडे करायलाही मदत करते. हे सगळे अनाकलनीय आहे.
या तिघांच्याही आयु्ष्याला वेगळे वाटणारे परंतु, कुठेतरी एकमेकांशी जोडले गेलेले पैलू आहेत. मारीयाला यश, कीर्ति आणि पैसा कमवायचा होता. त्यासाठी तिने नीरज ग्रोव्हरची शिडी केली. ग्रोव्हरला शरीरसुख हवे होते. पैसा त्याच्याकडे होता. त्याने मारीयाचा त्याच दृष्टिकोनातून उपयोग केला. मॅथ्यूला मारीया सशरीर हवी होती. त्यामुळेच तिचे दुसर्याशी असलेले संबंधही त्याला सहन करता आले नाहीत. हे तिघेही अतिशय फसव्या, वरवरच्या दुनियेत वावरत असल्याचेही दिसते. या तिघांच्याही हेतूत ठोस काहीही नाही. कोणतीच गोष्ट दीर्घकाळ टिकणारी नाही. तरीही त्यांना त्याची भूल पडली आणि हे घडले.
पाश्चात्य संस्कृतीचे आक्रमण हा घासून गुळगुळीत झालेला शब्द आहे. आरूषी आणि नीरज यांच्या हत्येबाबत बोलणार्या माध्यमांमधून वा त्यांच्या भाईबंद चॅनेल्समधूनच ती घराघरांत जाऊन पोहोचली आहे. विविध मालिकांतून परस्त्रीशी असलेले संबंध ही आता 'एक्स्ट्रा मॅरीटल अफेअर्स' म्हणून जणू काही सन्मानानं मिरवण्याची किंवा राजरोस चर्चेची गोष्ट झालीय, असे वाटते. विवाहबाह्य संबंधांचे चित्रण केले गेलेले नाही, अशी एकही मालिका दाखविणे मुश्किल आहे. हाच समाज या मालिका अतिशय चवीने पाहतो, त्यावर गॉसिपंगही होते. मग या सगळ्याचा परिणाम लहान मुलांवर आणि एकुणात समाजावरही पडणार नाही काय?
एकुणात जगण्याची मुल्ये बदलली आहेत. मुल्य शिक्षणाला आज काय किंमत राहिली आहे? फक्त शाळेतल्या मार्कांपुरती. आयुष्यात मुल्यांचा संबंधही कधी येत नाही. थिल्लर, उथळ गोष्टींना अनावश्यक महत्त्व जास्त आले आहे. पाश्चात्य संस्कृतीविरोधात आक्रंदन करणारी माध्यमे तरी काय प्रसवतात? बॉलीवूड आणि फॅशनच्या क्षेत्रात काय घडलेय याची 'सचित्र' माहिती शेतकर्यांच्या आत्महत्येपेक्षा महत्त्वाची ठरली आहे. विधायक गोष्टींपेक्षा विघातक गोष्टींची प्रसिद्धी ही हमखास खपाचा 'फॉर्म्युला' ठरली आहे. जगण्याची तीव्र स्पर्धा, पैसा मिळविण्याची निकड त्यासाठी मुल्यांचा बळी देण्याची वृत्ती हाच आजच्या जगाचा भाग आहे. म्हणूनच अशा बातम्या ऐकू येणे ही सहज बाब बनली आहे.
या सगळ्या गदारोळातच नाती हरवत चालली आहेत. नात्यांमधले प्रेम, आपुलकी हरवली आहे. आई, वडिल, मुलगा यांच्यातील निखळ जिव्हाळा पुसत चालला हे. प्रियकर- प्रेयसीच्या नात्यातील हळवेपणा, त्यागही मिटत चालला आहे. बाजारूपणाने नात्याचा अगदी खून केला आहे. गदिमांनाही ही स्थिती कदाचित आधीच ठाऊक असावी की काय? कारण त्यांनीच लिहून ठेवलंय.
लळा-जिव्हाळा शब्दच खोटे, मासा माशा खाई
कुणी कुणाचे नाही राजा, कुणी कुणाचे नाही
रक्तहि जेथे सूड साधते, तेथे कसली माया?
कोण कुणाची बहीण, भाऊ, पती, पुत्र वा जाया
सांगायाची नाती सगळी, जो तो अपुले पाही
Monday, May 26, 2008
Thursday, May 22, 2008
मराठीपलिकडचे तेंडुलकर
तेंडुलकर किती मोठे होते, हे दुर्देवाने मराठी माणसाला कळलेच नाही. मराठी भाषा टिकविण्याची आंदोलने होत असताना हा मराठी नाटककार, मराठीत लिहून राष्ट्रीयच नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचला होता. अनेक भारतीय भाषांत त्यांची नाटके अनुवादीत झाली आहे. इंग्रजीतही ती गेली आहेत. दोन वर्षापूर्वी अमेरिकेत आणि कोलकत्यातही त्यांच्या नाटकांचा महोत्सव झाला होता.
तेंडुलकरांची नाटके देशभरात ठिकठिकाणी होत असतात. पण आम्ही त्यांना फक्त मराठीच्याच फक्त कोत्या दृष्टिकोनातून बघतो. त्यांच्या जाण्याबद्दल इतर भाषांमधील ज्येष्ठ व्यक्तिंशी बोलल्यानंतर आपण काय गमावले याची जाणीव झाली.
ज्येष्ठ बंगाली साहित्यिक सुनीलकुमार गंगोपाध्याय यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी तेंडुलकर हा 'ग्रेट' माणूस होता, अशा शब्दांत तेंडुलकरांविषयीच्या भावना मांडल्या. ते म्हणाले, की तेंडुलकरांची सखाराम बाईंडर, घाशीराम कोतवाल, कमला, ही नाटकं बंगालीतही आली. अधूनमधून ती सादरही होत असतात. कोलकत्यात अनेकांना ती आवडली आहेत.
रवींद्रनाथ टागोर, शरदचंद्र, बंकिमचंद्र यांच्यासारख्या महान साहित्यिकांचे साहित्य मराठीत आल्याचा आनंद आपल्याला जसा होतो, तसाच तेंडुलकरांची नाटके बंगालीत होऊन ती सादरही होतात, याविषयी मात्र आपला अभिमान फारसा दिसून येत नाही. किंवा अनेकदा ते माहितही नसतं.
तेंडुलकरांविषयी बोलताना मी दोन तीनदा त्यांना भेटलो. आमच्याच चांगली चर्चाही झाली. माझ्या शोध या पटकथेचे त्यांनी हिंदी रूपांतर केले होते. त्यानिमित्ताने माझा त्यांच्याशी संबंध आला होता, अशी आठवणही श्री. गंगोपाध्याय यांनी संगितली.
तेंडुलकरांचा प्रभाव आसामी भाषेवरही आहे. आसामीतही त्यांची नाटके अनुवादित झाली आणि त्याचे प्रयोगही होतात. तेंडुलकर गेल्याची बातमी आसामी नाट्य संमेलनाचे कार्यकारी अध्यक्ष उमेश शर्मा यांना सांगितली तेव्हा ते हळहळले. ते म्हणाले, मी त्यांना कधी भेटलो नाही. पण ते आमचा आदर्श होते. आमच्यासाठी ते एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व होते. त्यांच्या नाटकांचे विषय, मांडणीचे तंत्र, नेपथ्य अशा अनेक बाबी आम्हीही स्वीकारल्या आहेत.
आसाममध्ये अनेक ग्रुप तेंडुलकरांची नाटके करतात. दुतल रॉय, माणिर रॉय, रवजिता गोगोई यांचा जिरसंग ग्रुप यापैकीच आहे. बहारूल इस्लाम आणि भागिरथी हेही तेंडुलकरांच्या नाटकाने प्रभावीत झालेले आहेत. तेंडुलकरांच्या जाण्याने आम्ही बरेच काही गमावले ही श्री. शर्मा यांची प्रतिक्रिया खूप काही सांगून जाणारी आहे.
नाट्यकर्मी तपन मुखर्जी हेही तेंडुलकरांचे चाहते आहेत. ते म्हणतात, की मी तेंडुलकरांना कधी भेटलो नाही, पण त्यांच्या नाटकांचा माझ्यावर मोठा प्रभाव आहे. त्यांच्या नाटकात असं काही होतं की त्यामुळे लोक त्याकडे खेचले जायचे. सामाजिक परिस्थितीवरील त्यांचे बोचरे भाष्य अनेकांना त्यामुळेच आवडतही नव्हते. 'सखाराम बाइंडर' या नाटकाचा प्रयोग इंदूरमध्ये झाला त्यावेळी तपन मुखर्जी यांनी त्यात भूमिका केली होती.
तेंडुलकरांची नाटके देशभरात ठिकठिकाणी होत असतात. पण आम्ही त्यांना फक्त मराठीच्याच फक्त कोत्या दृष्टिकोनातून बघतो. त्यांच्या जाण्याबद्दल इतर भाषांमधील ज्येष्ठ व्यक्तिंशी बोलल्यानंतर आपण काय गमावले याची जाणीव झाली.
ज्येष्ठ बंगाली साहित्यिक सुनीलकुमार गंगोपाध्याय यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी तेंडुलकर हा 'ग्रेट' माणूस होता, अशा शब्दांत तेंडुलकरांविषयीच्या भावना मांडल्या. ते म्हणाले, की तेंडुलकरांची सखाराम बाईंडर, घाशीराम कोतवाल, कमला, ही नाटकं बंगालीतही आली. अधूनमधून ती सादरही होत असतात. कोलकत्यात अनेकांना ती आवडली आहेत.
रवींद्रनाथ टागोर, शरदचंद्र, बंकिमचंद्र यांच्यासारख्या महान साहित्यिकांचे साहित्य मराठीत आल्याचा आनंद आपल्याला जसा होतो, तसाच तेंडुलकरांची नाटके बंगालीत होऊन ती सादरही होतात, याविषयी मात्र आपला अभिमान फारसा दिसून येत नाही. किंवा अनेकदा ते माहितही नसतं.
तेंडुलकरांविषयी बोलताना मी दोन तीनदा त्यांना भेटलो. आमच्याच चांगली चर्चाही झाली. माझ्या शोध या पटकथेचे त्यांनी हिंदी रूपांतर केले होते. त्यानिमित्ताने माझा त्यांच्याशी संबंध आला होता, अशी आठवणही श्री. गंगोपाध्याय यांनी संगितली.
तेंडुलकरांचा प्रभाव आसामी भाषेवरही आहे. आसामीतही त्यांची नाटके अनुवादित झाली आणि त्याचे प्रयोगही होतात. तेंडुलकर गेल्याची बातमी आसामी नाट्य संमेलनाचे कार्यकारी अध्यक्ष उमेश शर्मा यांना सांगितली तेव्हा ते हळहळले. ते म्हणाले, मी त्यांना कधी भेटलो नाही. पण ते आमचा आदर्श होते. आमच्यासाठी ते एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व होते. त्यांच्या नाटकांचे विषय, मांडणीचे तंत्र, नेपथ्य अशा अनेक बाबी आम्हीही स्वीकारल्या आहेत.
आसाममध्ये अनेक ग्रुप तेंडुलकरांची नाटके करतात. दुतल रॉय, माणिर रॉय, रवजिता गोगोई यांचा जिरसंग ग्रुप यापैकीच आहे. बहारूल इस्लाम आणि भागिरथी हेही तेंडुलकरांच्या नाटकाने प्रभावीत झालेले आहेत. तेंडुलकरांच्या जाण्याने आम्ही बरेच काही गमावले ही श्री. शर्मा यांची प्रतिक्रिया खूप काही सांगून जाणारी आहे.
नाट्यकर्मी तपन मुखर्जी हेही तेंडुलकरांचे चाहते आहेत. ते म्हणतात, की मी तेंडुलकरांना कधी भेटलो नाही, पण त्यांच्या नाटकांचा माझ्यावर मोठा प्रभाव आहे. त्यांच्या नाटकात असं काही होतं की त्यामुळे लोक त्याकडे खेचले जायचे. सामाजिक परिस्थितीवरील त्यांचे बोचरे भाष्य अनेकांना त्यामुळेच आवडतही नव्हते. 'सखाराम बाइंडर' या नाटकाचा प्रयोग इंदूरमध्ये झाला त्यावेळी तपन मुखर्जी यांनी त्यात भूमिका केली होती.
Subscribe to:
Posts (Atom)
