Sunday, November 22, 2009

गांधी आणि मी


अंबरीष मिश्र यांच्या मौजवरील लेखावर आधारीत 'उचललेस तू मीठ मूठभर' या मिसळपाव या संकेतस्थळावर लिहिलेल्या लेखावरून जे वाद निर्माण झाले, त्यावर माझी लेखनभूमिका स्पष्ट करणारा हा लेख....

गांधीजींनी भारतात जे काही कार्य केले, त्याचा पाय दक्षिण आफ्रिकेत कसा रचला गेला, त्यांनी काय काय 'प्रयोग' केले त्यासाठी अंबरिश मिश्र यांचे 'गंगेत गगन वितळले' हे पुस्तक वाचायलाच हवे. गांधीजींची जडणघडण त्यातून कळते. अर्थात, हे लिहिताना गांधींकडे फार खालून पाहिल्याने ते उंच दिसतात, यात काही वाद नाही. पण गांधींची ही जडणघडणही सोपी नाही. त्यातल्या अनेक प्रयोगांसाठी त्यांनी इतरांनाही भरडले आहे, स्वतःला तर आहेच आहे. भारतीय तत्वज्ञान, संस्कृती आणि परंपरांचा फार अभ्यास त्यांनी केल्याचेही लक्षात येते.

बाकी. गांधींच्या या एका सत्याग्रहामुळे देशाला स्वातंत्र्य मिळाले हे म्हणण्याचे धाडस मी तरी कधीच करणार नाही. कारण बाकीच्या सशस्त्र क्रांतिकारकांबद्दलही मला तितकीच आस्था आहे.

सुरवातीला तर माझ्यापुढे गांधी म्हणजे 'खिलाफत चळवळीला पाठिंबा देणारे, चौरीचौराच्या आंदोलनानंतर आंदोलकांचा हिरमोड करणारे, चले जावमधील हिंसेबद्दल काही न बोलणारे, फाळणीच्या योजनेला मान्यता देणारे, प्रसंगी जिनांकडे या देशाची धुरा द्या, पण फाळणी होऊ देऊ नका असे म्हणणारे, पाकिस्तानी टोळीवाल्यानी घुसखोरी केल्यानंतरही पाकिस्तानला त्यांच्या वाट्याचे ५५ कोटी द्या असा आग्रह धरणारे असेच गांधी होती. गांधींविषयी नकारात्मक मते बनविण्यासाठी एवढी उदाहरणे पुरेशी होती. यालाच मग नेहरूंना पुढे आणणे, पटेलांना मागे सारणे, सुभाषबाबूंना कॉंग्रेस अध्यक्ष म्हणून काम करू न देण्यासारखी परिस्थिती निर्माण करणारे, भगतसिंगांच्या फाशीविषयी स्वतःचा शब्द खर्ची न पाडणारे इत्यादी उपप्रकरणेही गांधींची 'खलनायक' म्हणून प्रतिमा करायला पुरेशी होती. ओशोंचे गांधीवादाची खिल्ली उडवणारे पुस्तक वाचल्यानंतर या 'महात्म्या'ची किवही आली.

सावरकर आणि टिळकांबद्दल आस्था असल्याने गांधींविषयीचे हे नकारात्मक मुद्दे फार प्रकर्षाने दिसून यायचे. त्यात एका मोठ्या माणसांविषयी त्याच्या चुका दर्शविणारी पुस्तके बरीच असल्याने आणि चर्चा त्याचीच होत असल्याने ही मतेही ठाम बनली होती. पण पुढे गांधी वाचायला सुरवात केली आणि काही धुके निवळले. त्यांचे इतरही गुण पैलू दिसून आले. याचा अर्थ गांधी पूर्णांशाने चांगले होते असे नाही, पण त्या कालखंडावर अफाट असा प्रभाव त्यांनी कसा निर्माण केला याविषयी काही हाती लागले.

मुळात गांधी अखिल भारताला व्यापून कसे उरले होते, याचे आश्चर्य वाटायचे. लोकांमध्ये त्यांची प्रचंड लोकप्रियता का होती? ब्रिटिशांनाही भारताविषयी बोलण्यांसाठी हा नंगा फकिरच का सापडायचा? आणि परदेशातही त्यांनी अनेकांना प्रेरणा कशी दिली असावी? असे अनेक प्रश्न पडायचे. माझ्या पणजे सासूबाईंनी एकदा सांगितले, की त्या बंगालमध्ये असताना गांधीजी त्यांच्या गावी आले होते. त्यावेळी आम्ही त्यांच्या पाया पडलो, त्यासाठी कशी झटापट चालली होती याचं रसभरीत वर्णन त्यांनी केलं होतं. अनेक स्त्रियांना त्यावेळी त्यांच्यासमोर आंदोलनासाठी स्वतःचे दागिने काढून दिल्याचे त्यांनी सांगितले. हा किस्सा ऐकल्यानंतर तर अजूनच आश्चर्य वाटले. असे किस्से पुस्तकातून वाचणे वेगळे नि प्रत्यक्ष त्याचे साक्षीदार असलेल्या व्यक्तीकडून ऐकणे वेगळे. त्यांच्या या किश्श्यामुळे थरारून जाऊन मी गांधी वाचायला सुरवात केली. त्यात काही चांगल्या गोष्टी सापडत गेल्या. त्यांची जडणघडण कळली. स्वतःवर केलेले प्रयोगही समजले. भारतीय तत्वज्ञान, संस्कृती याचा अभ्यास त्यांच्याइतका दुसर्‍या कोणत्याही भारतीय नेत्याने क्वचित केला असावा असे वाटले. भारतीय मानसिकताही त्यांनी बरोबर ओळखली म्हणूनच त्यांना झेपेल, पचेल रूचेल असेच आंदोलन त्यांनी चालवले.

पण त्याचवेळी त्यांचे इतरही 'गुण' जाणवले. संयमनाचा अतिरेक. नैतिक मुल्यांमध्ये त्यांच्या मुलांची झालेली फरफट. खादीचा अट्टाहास. वगैरे वगैरे.
दुसर्‍यांना स्वतःच्या नियमांमध्ये बसविण्याचा अट्टाहास करणारा हटवादी 'महात्मा'ही यातूनच कळला. (प्रभा नारायण आणि जयप्रकाश नारायण यांना म्हणे त्यांनी 'आत्मसंयमन' पाळायला सांगितले होते! )

या देशाला फक्त गांधींमुळे स्वातंत्र्य मिळाले यावर माझाही विश्वास नाही. पण त्यांचे योगदान मोठे होते, हेही टाळून चालणार नाही. त्याचवेळी गांधींचा कॉंग्रेसमध्ये झालेला उदय तोपर्यंत कॉंग्रेसमध्येच सक्रिय असलेल्या जिनांना वळचणीला टाकणारा ठरला आणि त्यातच फुटीरतेची बिजे पेरली गेली हेही तितकेच सत्य आहे. कॉंग्रेसचे सर्वमान्य नेते म्हणून गांधींनी एस्टाब्लिश होताना जिनांना अलगद दूर सारले नि कॉंग्रेसवर वर्चस्व मिळवले हे सत्य आहे. पण हे करताना त्यांनी सर्वांना बरोबर घेतले (जिना वगळता) हेही लक्षात घेण्यासारखे आहे.

जिना आणि गांधी यांच्यातील 'लव्ह अँड हेट' रिलेशनशिपही पहाण्यासारखी आहे. गांधीजींच्या हत्येनंतर जिनांनी पाकिस्तानातील शोकसभेत त्यांचा उल्लेख म्हणे 'मि. गांधी' असाच केला होता.

2 comments:

Narendra prabhu said...

'आपला तो बाब्या आणि दुसर्‍याच तो कार्टा' असा भेदभाव गांधींनी नेहमीच केला. नेहरूंची लेडी. माऊंटबॅटन बरोबरची थेरं त्यांना चालली आणि रितसर लग्न झालेल्या जयप्रकाशांना त्यांनीने ब्रम्हचर्य पाळायला सांगितलं. नेताजी सुभाषबाबू, सरदार वल्लभभाई पटेल यांच्यावर तर सरळ सरळ अन्याय झाला हा इतिहास आहे.

abhay said...

Narendra

जयप्रकाश नारायण यांना महात्मा गांधी यांनी ब्रह्मचर्य पाळण्यास सांगितले नव्हते . प्रभावातींचा तो निर्णय होता आणि जयप्रकाश यांनी त्याचा मान राखला .