Tuesday, March 30, 2010

पुस्तकं 'खाण्याचं' खूळ !

पुस्तकांनी आयुष्य बदलून जातं असं थोर लोक म्हणतात. अस्मादिकांना हा अनुभव वयाच्या फार लवकर आला. कारण आयुष्याच्या या गाफील क्षणी पुस्तके हातात आली नि दुकानात बसून पिढीजात व्यवहार करण्याऐवजी अस्मादिक शब्दव्यवहारात गढून गेले. 'हे द्या ते द्या' या ग्राहकी आरोळ्यात आम्ही मात्र हातीमताई, विक्रम-वेताळ, गुलबकावली, ठकसेन यांच्या जगात वावरत होतो. वाचनानंदी लागलेली ही टाळी गिर्‍हाईकाच्या टाळीनेच भंग पावायची हा भाग अलाहिदा. शिवाय ग्राहकाने मागितले एक की द्यायचे भलतेच, पैशाच्या देण्याघेण्यात होणारी चूकभूल, वस्तुमापनात होणारा गोंधळ हा भाग तर नित्याचा. विद्याभाराने जड झालेले (नि व्यवहारीक काम न करणारे) डोके मग जन्मदात्याच्या जड हातांनीच एका फटक्यातच रिते व्हायचे. दुकानाच्या अलीकडे न उभे रहाता पलीकडेच कायम उभे रहायचे हा धडा घेतला तो त्याचवेळी. आयुष्य बदलाचा आलेला हा पहिल्या (वाचन)धारेचा अनुभव म्हणायला हरकत नाही.

आयुष्याची पाने फडफडत असताना एकीकडे पुस्तकाची पानेही फडफडत होतीच. कॉलेजात जाण्याच्या वाढत्या वयात तर त्याला मुळी घरबंध उरला नाही. आयुष्याला कोणत्याच एका रंगाने रंगवायचे नाही, हा धडा पुस्तकांनीच शिकवला. त्यामुळेच पिवळ्यापासून लालपर्यंत कोणत्याही रंगाची पुस्तके हातातून सुटली नाहीत. भगवे, लाल, निळे हिरवे असे सर्व रंगी साहित्य मनसोक्त वाचले. पण ही पुस्तके वाचूनही नजर कोणत्याच एका रंगाची झाली नाही.

खाणे हा वाचणे या शब्दाचा पर्यायवाची शब्द बनला. त्यामुळे पुस्तके ही 'खाल्ली' गेली नि त्यासोबत पोटातही भर पडतच होती. दोन्हीची गती सारखीच असल्यामुळे हा विद्येचा भार डोक्यावर दिसत नसला तरी पोटावर मात्र अंमळ दिसू लागला तो तेव्हापासून. शिवाय अंतिमतः डोक्यालाही तो भार सहन न होऊन केसांनी शरणागती पत्करली. 'डोळ्यास पापण्यांचा का सांग भार व्हावा' असा प्रश्न त्याच काळात पडला नि चष्मा नावाचा नवीन अवयव आपल्या कान आणि नाक या दोन अवयवांवर बांडगूळासारखा नांदणार असे निदानही झाले. वाचनाने 'हार्डवेअर'मध्ये असा बदल घडवून आणल्यावर तोंडातल्या भाषेनेही सॉफ्टवेअरमध्ये राहिलेला बदल पूर्ण केला.

वाचन आता तोंडावर नाचायला लागलं नि पुस्तके तोंडात येऊन बोलू लागली. म्हणूनच एकदा ज्येष्ठ भगिनींबरोबर एका चित्रपटाला जाऊन आल्यानंतर त्याच्या स्तुतीपर 'छायाचित्रण छान होते नाही? आणि अभिनयही वाखाणण्याजोगा होता', या अस्मादिकांच्या स्तुतीसुमनांबरोबर एक जोरदार धपाटा पाठीत पडला आणि वर 'छापखान्याचे खिळे तोंडात बसविल्यासारखा पुस्तकी बोलू नकोस', असा 'गटणे' टोलाही भगिनीभावाने हाणला. लोक शिव्या घालतात तेव्हा त्यांच्यावर संस्कार नाही असे बोलले जाते, इथे वाचनसंस्कार बोलण्यातून येऊनही शेवटी आम्ही धपाट्याचेच धनी ठरलो. अर्थात, पुढील आयुष्यात असेच शाब्दिक धपाटे पाठीत बसत गेले नि त्याचीही सवय झाली.

वाचनाने शब्द जिभेपुढे आणून ठेवले नि त्यांना उच्चारण्याचा आगाऊपणाही देऊ केला. त्यामुळे आगीतून फुफाट्यात, उचलली जीभ लावली टाळ्याला, भोगा कर्माची फळे वगैरे वाक्प्रचारांचा नेमका अर्थ काय याचीही जाणीव झाली. एकदा कुठल्याशा धार्मिक कर्मकांडाप्रसंगी 'यात काही 'राम' नाही, असे वाक्य उच्चारले नि त्या समर्थनार्थ कुठल्याशा पुस्तकातला संदर्भ दिला. त्यावर जमलेल्या ज्येष्ठांनी एकमताने याला फार शिंगे फुटली आहेत, असे जाहिर करून टाकले. जिभेच्या या आगाऊपणापायी 'अतिशहाणा, दीडशहाणा, विद्वान, पंडित, साडेतीन शहाणे आदी विशेषणे जोडली गेली आहेत. बरं यातून पापक्षालनासाठी जिभेला आवर घातला की हा पहा 'माणूसघाणा', घुम्या आदी नवी विशेषणे न बोलता लागली गेली. या विशेषणांचे ध्वनी पाठमोर्‍या अवस्थेतच आजही अगदी विशेषत्वाने ऐकू येतात.

तिकडे घरच्यांनाही आपला तो बाब्या वाटण्याऐवजी 'कारटे' वाटावे ही या वाचनवेडाचीच परिणती म्हणावी. कारण कुठलेही काम सांगितल्यानंतर पुस्तकातून मान वर काढून ते होणार याची कोणतीही स्पष्ट ग्यॉरंटी त्यांना कधीच मिळाली नाही. शिवाय ते काम लादल्यानंतर त्याचे झालेले परिणामही 'एक गोष्ट सांगितली की भलतीच आणणे, यात व्हायला लागल्याने ते करणेही त्यांनी टाळले. अशा या मोकळीकीने आमचे वाचनाचे वारू बेफाम वेगाने दौडू लागले यात काय नवल. किमान पोरगा उगाचच उंडारत बसत नाही, वाचतच बसतो, यातच आमच्या मायबापाने समाधान शोधले. वाचनात मान खाली बसल्याच्या या सवयीमुळे अनेकांना अस्मादिकांची मानच तशी आहे की काय असा प्रश्न पडायचा, पण अतिताणामुळे डोळे वर करून पाहण्याच्या नादात नजर गुंतवून टाकणार्‍या कुण्या आकृतीत नजर अडकल्यावर त्यांचा हा समजही आपोआपच फोल ठरायचा.

'वाचेल तोच वाचेल' या उक्तीवर असलेल्या ठाम विश्वासापायी पुढे 'कलमी मनसबदारी' मिळाली. ही मनसबदारी निभावण्यापोटी अनेक रात्री जागवाव्या लागल्या. त्यातूनच रात्री 'वाचनाचे प्रयोग' सुरू झाले. मध्यरात्र ते कधी कधी पहाटेपर्यंत वाचन सुरू राहिल्याने या संबंध काळात सकाळचा सूर्य 'कसा दिसतो तो आननी' हे कधीच कळले नाही. परंतु,  दुपारच्या प्रकाशावरून सूर्य हा पीतरंगी आहे हा ठाम समज रूढ झाला. शिवाय तांबारलेले आणि सुजलेले डोळे घेऊन ऑफिसात जाऊ लागल्यामुळे 'जागत्या' पत्रकाराच्या जातीत नांदणारा अशी ओळख दृढ झाली आहे ती वेगळीच.

वाचनाने 'फुटलेल्या शिंगांनी' इतरांना अंगावर घेतले नि स्वतःलाही जखमी करवून घेतले. त्यातल्या काही तर सुगंधी जखमा होत्या. या जखमेवर फुंकर घालता घालता 'तिने लाजून हो म्हटले नि मनात गाणे नाचत सुटले' हा साक्षात अनुभवही आला. 'व्यसनी नवर्‍यापेक्षा 'वाचनी' नवरा केव्हाही चांगला, हा वाक्प्रचारही तिने त्याच भरात जन्माला घातला असावा. पण हे विधान करण्याची वेळ कोणती होती, याचा आजही ती शोध घेते आहे. कारण जळालेली दुधाची भांडी, करपलेल्या भाज्या, उतू गेलेला चहा, कुकरचे झाकण उडून छताला लागलेले अन्न या सार्‍या माझ्या वाचनानंदी लागलेल्या समाधीतून घडलेल्या बायप्रॉडक्टच्या जिवंत खाणाखुणा आजही घरात नांदत आहेत. शिवाय पुस्तके वाचता वाचता टळून गेलेली अनुक्रमे, फिरायला जाण्याची, शॉपिंगची, चित्रपटाची, कुठल्याशा कार्यक्रमाची नि हो तिच्या बहिणीच्या साखरपुड्याची वेळ याची भरपाई मी अजूनही करू शकलेलो नाही. त्यामुळे दर नव्या पुस्तकामागे यातली प्रत्येक वाक्य अदलाबदलीने वापरण्याची वेळ काही चुकत नाही. आता तर आईचीच मुलगी असलेल्या कन्येनेही हा धडा गिरवायला घेतला आहे. तिच्या कोणत्याही कामात मदत करण्याचे धुत्कारल्यानंतर 'बाबा वाचत बसलाय' हे एकच ब्लॅकमेलिंगचे वाक्य फेकून ती मला काहीही करायला भाग पाडू शकते. कारण ती मदत अव्हेरल्यानंतर घरात किती प्रकारचे आवाज ऐकू येऊ शकतात, याची कल्पना नुसत्या वाचनातून येणार नाही. तो अनुभवाचा भाग आहे.

समृद्ध झालेल्या वाचनाने या सगळ्या अनुभवाकडे पाहण्याचा विशिष्ट डोळा दिला आहे. कुठल्याही घटनेकडे त्रयस्थपणे पाहण्याची नवी दृष्टी विकसित झाली आहे. पण त्याचवेळी लौकीकापलीकडे जाऊन सहवेदना अनुभवण्याची संवेदनशीलताही दिली आहे. म्हणूनच या सांसारीक अनुभवानंतरही अस्मादिकांचे वाचन काही सुटलेले नाही. रात्री अंथरूणात पडल्या पडल्या, बाथरूमात विधी करत असताना, बसमध्ये प्रवास करत असताना किंवा कुठे फिरायला गेल्यानंतर हळूचकन पुस्तक बाहेर निघते नि शब्दांचे ते अद्भुत विश्व माझ्यापुढे उभे ठाकते. आजूबाजूचे विश्व हरपून टाकण्याचे 'भान' ती पुस्तकेच मला देतात. फक्त 'बाबा पुस्तक वाचतोय' या तेवढ्या हाकेकडे माझी नजर असते, बस्स!

साहित्य संमेलनानिमित्त लोकमतच्या मैत्र व ऑक्सिजन या पुरवण्यात हा लेख पूर्वप्रकाशित झाला आहे. छायाचित्रही त्याच पुरवणीतून साभार.  

Friday, March 26, 2010

सावध ऐका (मागल्या) हाका!

पदार्थाची चव लिहून सांगता येत नाही, तो अनुभवाचा भाग आहे, तद्वतः इंदूरी हाकांचे विश्व हा खास अनुभवाचाच भाग आहे. आता लेखाची सुरवातच खाद्यपदार्थाच्या शब्दाने व्हावी हा खास इंदुरी असल्याचा अपरिहार्य नि अटळ परिणाम आहे. पण तो अट्टल खवय्या असल्याची साक्षही आहे. इंदुरात आल्यावरही इथल्या हाकांमध्ये भिजले नाहीत नि त्या हाका तुमच्या जिभेत भिजल्या नाहीत, तर तुम्ही 'इंदौरकर' कधीच होऊ शकणार नाही. इथल्या भय्याचा उच्चार तुम्ही कोणत्या वेळी, कोणासमोर नि कसा करता यावरही तुम्ही इंदौरी आहात की नाही हे ठरते. सबब, यापुढे कधीही इंदूरला आल्यास हा दिलेला गृहपाठ केल्याशिवाय येऊ नये असा खास सल्ला दिल्याशिवाय रहावत नाही.

आता हेच पहा ना. एरवी भाऊ असा सरळ सोपा नि साधा अर्थ असलेल्या भय्या या हिंदीभाषक शब्दाचे 'नवनिर्माण' झाल्याचे आपण पहातो आहोतच. भय्या या संबोधनात 'बिहार' नि 'उत्तर प्रदेश'च सामावल्याचे दिसते. पण मध्य देशी आल्यानंतर मात्र भय्यात किती विश्व सामावले आहे, याचा अंदाज येतो.

एरवी आपल्याकडे अपरिचित, अल्पपरिचित मंडळींना हाक मारण्यासाठी काका, मामा, दादा, भाऊ, अप्पा, अण्णा, ताई, काकू, मावशी, मामी या शब्दांची रास आहे. अगदीच गेला बाजार 'अहो, शूक शूक तुम्ही तुम्ही' यानेही काम भागते. पण भय्यासारखा सर्वव्यापी शब्द मात्र आपल्याकडे नाही. दादा, भाऊमध्ये ती सर नाही. याउलट भय्यांत किती छटा लपल्यात म्हणून सांगू? नुसती हाक म्हणून, आदर म्हणून, नातं आड आलं म्हणून, नातं आड यावं म्हणून, नुसता 'आड' आला म्हणून हा शब्द बाहेर पडतोच. पण राग-चीड-द्वेष- हिणविणे या आणि अशा अनेक भावनांत बुडूनही हा शब्द तोंडातून 'फुटतो'. पण या शब्दांतल्या भावनांचा अदमास त्याचे उच्चारण समजून कळल्याशिवाय तुम्ही इंदौरात रूळलात असे म्हणताच येणार नाही, महाराजा.

आता तुम्ही इथल्या कुठल्याही चांगल्या-चुंगल्या दुकानात खरेदीला गेलात तर हाच शब्द 'भय्या, जरा वो कपडा दे ना'. म्हणून सोज्वळ रूप धारण करतो. रस्त्यावरच्या पोहेवाल्याकडे, पाणीपुरीच्या ठेलेवाल्याकडे, गल्लीत आलेल्या तरकारीवाल्याकडे नि पानटपरीत राजेशाही थाटात बसलेल्या पानवाल्याकडे हाच शब्द विठ्ठलाला 'विठू' म्हणावे अशा लयदार पद्धतीने 'भिया' असा प्रेमळ होतो. इथल्या ब्ल्यू लाईन बसमध्ये बसून कुठे चालले असलात की त्यातला 'भय्याही' प्रेमळ असतो. पण बस 'नगरसेवा' (खासगी वाहतुकदाराची) असेल तर मग त्यातल्या तिकीटफाडू पंटरच्या तोंडून आपला उच्चार 'भियाव, जरा खिसको ना' असा भ्यावणारा झाल्यास भिऊन जायचे कारण नाही. ही इंदूरी त्र्यागाची 'भियाव' आवृत्ती असते. पण ती इतक्यावरच थांबत नाही. भर ट्रॅफीकमध्ये कुणी धडक मारल्यानंतर झालेल्या भांडणातही हा 'भिया'च कामी येतो. 'भिया, गाडी चला रिया या क्या कर रिया था? या वाक्यासरशी दोन भियातले भांडण पुढे कितीही काळ रंगू शकते. रस्त्यात चालता-चालता किंवा चालवता चालवता तुमचा 'ओ भिया हटो ना' असा उद्धार झाल्याशिवाय तुम्ही इंदुरात असल्याचा फिल अजिबात येणार नाही. शब्द साधा 'भिया' असला तरी त्याच्या उच्चारणाची न्यारी ढब तो 'फिल' नक्कीच देईल.

नात्या-गोत्यातही भय्या असतोच. पण अनेकदा नाती निर्माण करताना तो गोत्यातही आणतो. समवयस्क मुलाला हाक मारताना नाव घेऊन पुढे भय्या लावण्याची ही प्रथा अनेक पोरीबाळींसाठी सोयीची ठरत असली तरी त्या 'भय्या'चा मात्र 'वडा' होतो. पण वय वाढल्याचं अनुक्रमे तुमचे डोईवरचे केस 'दिसत नसल्यासारखे' झाल्यास वा ते पांढर्‍या रंगाला पर्याय ठरल्याचे वाटताक्षणी तुम्ही 'भाईसाब' म्हणून 'कन्व्हर्ट' होता ते तुमचं तुम्हालाही कधी कळत नाही. भाई या खास हिंदी शब्दाची मुंबई आवृत्ती इथे वापरात नाही, पण त्याचा मूळ अर्थ पकडूनही हा शब्द केवळ नातेनिदर्शक एवढाच उरला आहे. गेला बाजार अगदीच सार्वजनिक कार्यक्रमात आदरार्थी उच्चार म्हणून 'भाई प्रवीणजी', 'भाई दिलीपजी' असे ऐकायला येते. पण तो शब्द जपून ठेवायचा म्हणूनच. बाकी काही नाही.

समवयस्क विवाहित महिला आपल्याकडे वहिनी असतात, इकडे त्यांचे कन्वर्जन 'भाभी' किंवा 'भाभीजीं' मध्ये होत असले तरी त्याहीपेक्षा 'बेहेनजी' ही खास इथली साद ऐकण्यासारखी असते. बायकांचे कपडे विकणार्‍या दुकानात याचा वापर बराच होतो. पण त्यातही गिर्‍हाईक गटवायचे या भावनेने पेटलेला दुकानदार 'दिदी दिदी' म्हणूनही रूंजी घालत बसतो. पण हल्ली त्याही पलीकडे 'मेडम' हा शब्द रूळलाय. विशेषतः सहकारी किंवा अनोळखी महिलांसाठी. सायकलवरून जाणाराही समोर स्कूटी घेऊन जाणार्‍या महिलेला 'मेडम, जरा हटो', किंवा गाडी ठोकल्यास, 'ओ मेडम केसे गाडी चला रही हो', म्हणून पुकारा करेल. काही ठिकाणी या 'मेडम'च्या पुढे 'जी' जोडून भिजलेला आदर दर्शवला जाईल. लिखित भाषेत ही मेडम 'मैडम' अशी अंमळ वाकल्यासारखी दिसते.

आपल्याकडचे 'काका-काकू' इकडे 'अंकल-आंटी' म्हणून उरलेत. त्यामुळे थोड्या मोठ्या पुरूषांना अंकल नि बायकांना आंटी असा सर्रास उच्चार आहे. त्यामुळेच की काय कुणीही 'सोळावं वरिस' ओलांडलेली कन्या अस्मादिकांच्या माथ्यापर्यंत रूंदावलेल्या विस्तीर्ण भालप्रदेशाकडे पाहून 'अंकल' म्हणते तेव्हा तोपर्यंत अभिमानाने उंचावलेले मोजके चार केसही मान टाकतात. पण कधी तरी वाहतुकीच्या भर गर्दीत कॉलेज कन्यकांचा अडसर होत असला की 'आंटी, बाजू हटो' म्हणून कधीचा तरी सूड कुठे तरी नि केव्हा तरी अखेर उगविण्याची संधी मिळते. उगाचच 'आंटी' संबोधून समोरचीच्या चेहर्‍यावरचे बदलते भाव पाहून, त्याला अजिबात भाव न देण्याइतकी इंदौरची नवी पिढी सोकावलीय. पण तरीही 'आंटी मत कहो ना, असा लाडीक स्वर सहसा कुठे ऐकल्याचे आठवत नाही. एकुणात सध्या या अंकल नि आंटीचा आख्ख्या इंदौरमध्ये उच्छाद आहे.

दुकानदारी भाषेतले काही शब्दही खास आहेत. आपला माणूस इथे 'अपना आदमी' होतो, पण त्याहीपेक्षा 'अपना बंदा आएगा, सम्हलके लेना' हा उल्लेख खास इथला आहे. हा 'बंदा रूपया' इथल्या व्यावसायिक कट्ट्यावर टण्णकन आवाजानिशी आदळला नाही, तरच नवल. मग त्याच धरतीवर कधी कधी 'मुलींचा' उल्लेखही चक्क 'बंदी' असाही होऊन जातो. एखाद्या 'चाय'च्या 'गुमटी'वर गेल्यास तिथल्या 'पिंट्या'ला 'बालक' होतो. 'ए बालक, इधर आ' अशी हाक आपसूक निघून जाते.

आणि हो, इकडे आलात तर महाराष्ट्रातली मराठी शब्दांचे हिंदी भाषांतर करून बोलण्याची सवय सोडून दिलेलीच बरी. एरवी मराठी धाटणीचेच भाषांतरीत हिंदी रेटून नेऊन बोलण्याच्या मराठी सवयीला असाच योगायोगाने चाप बसला. आमचा एक मित्र खरेदीसाठी कपडा बाजारात गेला. खरेदी करता करता त्याने 'काका' या मराठी शब्दाचं भाषांतर करून 'चाचा, कुछ किमत कम करो' असं फर्मान सोडलं. झालं. समोरच्या दुकानदाराचं टाळकं सणकलं. चाचा? संतापून तो म्हणाला? मै क्या चाचा दिखता हूँ' इकडे मित्र गार. त्याला कळेचना. हा का चिडला ते? दुकानदाराचा संताप गळणे सुरूच, ' आपने दुकान नहीं देखी? महावीरजी का फोटो नही देखा? बाकी सारे जैन मुनियोंके फोटो नहीं देखें' तरीही मित्राचा डोक्यात काही शिरेचना. त्याने विचारलेच, लेकिन मैने गलत क्या कहा? तोपर्यंत त्या दुकानदाराला अंदाज आलेला की 'बेणं' बाहेरचं दिसतंय. तो म्हणाला, भाईसाब, यहॉं चाचा मतलब मुसलमान आदमी को बोलते है. मै जैन हूँ. समझे? मित्राच्या ज्ञानात भर पडली. शिवाय नको तिथे संबोधनांचे भाषांतर करणे टाळा हा धडा मिळाला.

हे झाले हिंदी बांधवांचे. आपल्या मराठमोळ्या मंडळींही 'सावध ऐका पुढल्या हाका' अशीच आहेत. इथल्या मराठी बांधवांची हिंदीवगुंठीत मराठी नात्यांची संबोधने जणू सराफ्यातल्या रसोत्पादीत जिलेबीचा थाट घेऊन तोंडातून टपकतात. आणि मग 'काका, मावशी के लिए मेसेज है', काकू आपको आईने हल्दीकुंकू के लिए बुलाया है'. 'मामा, तुम मामी को लेकर आओ, मैं आजी के साथ हूँ ही हिंदीच्या पुडीतली मराठी संबोधने ऐकायलाही मजा येते.

आताशा ही संबोधने आमच्याही 'कानवळणी' पडलीत. या संबोधनातली वळणेही आता जाणवू लागली आहेत नि त्याला प्रत्त्युतर करण्याची भाषाही आडवळणाने का होईना समजू लागली आहे. म्हणूनच रस्त्यावर सवयीप्रमाणे मध्येच गाडी घालून रस्ता तयार करण्याची खास इंदौरी प्रथा पाळणारा गाडीस्वार आला, की 'ए भिया, गाडी चला रिया, या हवाई ज्यहाज', अशी इंदौरी भाषा तोंडातून बाहेर पडल्याशिवाय चैन पडत नाही.

आमच्या इंदौरी झाल्याचा आणखी काय पुरावा द्यायला हवा काय? चला भय्या, थांबतो आता, सराफ्यात जाईन म्हणतो.