Monday, February 1, 2010

'मराठी' म्हणजे नेमके कोण?

मुंबई कुणाची या मुद्यावरून शिवसेना आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ तसेच त्यांची राजकीय शाखा असलेल्या भाजपमध्ये कलगीतुरा रंगलेला असतानाच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आणि 'मराठी ह्रदयसम्राट' राज ठाकरे यांनी षण्मुखानंद सभागृहात मराठी म्हणजे कोण याची व्याख्याच जाहिर केली. राज यांची ही व्याख्या म्हणजे त्यांच्या वैचारीक गोंधळाचे नवे टोक आहे.

राज यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्थापनेवेळी शिवाजी पार्कवर घेतलेल्या सभेत मराठीची व्याख्या अशी केली होती. 'छत्रपती शिवाजी महाराज की जय असे म्हटलं की आपसुक 'जय' असं म्हणतो तो मराठी. ज्ञानेश्वरांपासून ते कुसुमाग्रजापर्यंत कवींच्या रचना तल्लीनतेने वाचतो तो मराठी'. ही व्याख्या बर्‍याच प्रमाणात व्यापक असल्याने महाराष्ट्रात रहाणारा आणि न राहाणारा पण मराठी भाषा, संस्कृती यांच्यावर प्रेम करणारा, आदर बाळगणारा नि अंगीकारणाराही त्यात येत होता. पण नव्या व्याख्येने मात्र अनेकांना मराठीच्या परिघातून खड्यासारखे दूर ढकलले आहे.

राज यांच्या नव्या व्याख्येनुसार 'जन्माने मराठी तोच मराठी. त्यामुळे नोकर्‍या त्यालाच मिळायला हव्यात. केवळ बोलता, लिहिता नि वाचता येते म्हणून त्याला मराठी म्हणता येणार नाही.' याचा अर्थ आत्तापर्यंत महाराष्ट्रात दीर्घकाळापासून आलेल्या परप्रांतीयांनी इथली भाषा, संस्कृती आत्मसात केली तरीही त्यांचा केवळ जन्म इथला नाही म्हणून त्यांना मराठी म्हणता येणार नाही?

जन्माने मराठी या शब्दातून राज यांना नेमके काय म्हणायचे आहे? ज्याचा जन्म महाराष्ट्रात झाला आहे तो मराठी की जो मराठी आडनावाच्या घरात जन्माला आहे तो मराठी? या प्रश्नाचा पूर्वार्ध लक्षात घेतला तर महाराष्ट्राबाहेर परभाषेच्या सानिध्यातही मराठी भाषेचा झेंडा डौलाने फडकवत ठेवणारी मंडळी मराठी ठरत नाहीत! ती महाराष्ट्रात आली तरीही ती मराठी ठरत नाहीत. शिवरायांच्या काळापासून दक्षिणेत गेलेली नि पेशव्यांच्या काळात उत्तर दिग्विजय केलेल्या मंडळींना
तीनशे-साडेतीनशे वर्षानंतर महाराष्ट्रात स्थान नाही, असा याचा अर्थ घ्यावा काय?

राज यांना असे म्हणायचे नसेल तर मग केवळ मराठी आडनावाच्या घरात जन्माला आला म्हणून तो मराठी हा निकष लावायाचा झाल्यास इथल्या भूमीशी एकरूप होऊन, त्यावर नांदणारी भाषा, संस्कृती आपलीशी करणारे गुजराती, मारवाडी काही प्रमाणात दाक्षिणात्यही यांना मराठी म्हणताच येणार नाही. मराठी साहित्यात मोलाची भर घालणारे ज्येष्ठ समीक्षक शंकर सारडा, लेखिका सुरेखा शहा, व्यावसायिक धूत कुटुंबिय, विदर्भातील शेतकर्‍यांच्या विधवांसाठी आंदोलन उभारणारे किशोर तिवारी यांच्यासारखी अमराठी मंडळी मराठी ठरणारच नाहीत. इतकेच काय पण मराठी अस्मितेचे प्रतीक असणारे छत्रपती शिवाजी महाराजही राजस्थानच्या सिसोदीया वंशातीलच होते, मग त्यांनाही आणि त्यांच्या वंशजांनाही मराठी म्हणता येणार नाही.

बाहेरून महाराष्ट्रात येणार्‍या मंडळींनी मराठी भाषेचा, संस्कृतीचा आदर करायला हवा. ती शिकायला हवी आणि अंगीकारयलाही हवी, हा आग्रह असल्याचे राज यांच्या आतापर्यंतच्या आंदोलनातून दिसून येत होते. पण एवढे करूनही ती व्यक्ती मराठी ठरणार नाही, असे सांगून आता राज यांनी त्या मंडळींची आणखी कोंडी केली आहे. यापैकी जी मंडळी मराठी तुच्छ मानून आपल्याच भाषेचा आडमुठा अभिमान बाळगत होती, त्यांना असलेला राज यांचा विरोध किमान समर्थनीय तरी होता. पण आता मात्र, मराठी बोलायला, लिहायला नि वाचायला शिकूनही एखादी अमराठी व्यक्ती मराठी ठरणार नसेल तर मग तो कोणत्या मार्गाने मराठी ठरेल हे तरी आता राज यांनी जाहीर करायला हवे.

या व्याख्येतून राज यांना महाराष्ट्रात अमराठी लोक अजिबात नको आहेत, हेच ध्वनित होते आहे किंवा महाराष्ट्रातल्या सर्व नोकर्‍या मराठी आडनावाच्या मुलांनाच मिळायला हव्यात, असा त्यांचा आग्रह दिसून येतो. पण त्यासाठी जी व्याख्या केली ती मात्र अनेकांवर अन्याय करणारी आहेच, पण त्यांच्या आतापर्यंतच्या आंदोलनातील निरर्थकत्व स्पष्ट करणारी आहे.

Monday, January 18, 2010

पिंडीभोवतीचं 'ब्रह्मांड'! (2)


पहिला भाग


उज्जैनला महांकालेश्वराच्या दर्शनासाठी मुख्य मंदिरात प्रवेश केल्यानंतर पुढे....

पुढे गेल्यानंतर उंच घुमट असलेली वास्तु लागली. इथेही रेलिंग होते. पण एका क्षणी पंधरा ते वीस फुटांवरून महंकालेश्वराचे दर्शन घेता येत होते. या रेलिंगच्या पलीकडे थोडी मोकळी जागा. तिथे नंदी आणि त्याच्यासमोर असलेल्या खोलीत महंकालेश्वराची पिंड असा मामला होता. एरवी गर्दी नसताना थेट तिथपर्यंत जाऊन दर्शन घेण्याची सोय असते. पण आज गर्दी असल्याने थेट पिंडीपर्यंत प्रवेश वर्ज्य होता. त्यामुळे लांबूनच दर्शन घेणे क्रमप्राप्त होते. नेहमीप्रमाणे भाविकांनी इथे रांग मोडून देवाच्या जास्तीत जास्त जवळ कसे जाता येईल, याची काळजी घेतली. त्यामुळे ढकलाढकली, खेचाखेची, धक्काबुक्की, आरडाओरडी, गोंधळ नि कोलाहल अशा अवस्था क्रमशः गाठल्या गेल्या.

समोरच्या रिकाम्या चौकात असलेले पिवळी वस्त्रे परिधान केलेले पुजारी या गोंधळाला आवर घालण्यसाठी 'आरडाओरडी'चे हुकमी अस्त्र वापरत होते. भाविकांकडून आणल्या गेलेल्या थाळ्यांवरील हार, नारळादी वस्तू उचलून घेऊन त्या महादेवचरणी वाहण्याची व्यवस्था पाहणारी पुजारी मंडळी अर्थातच तोर्‍यात होती. बाजू हटो, आगे बढो, आहिस्ते, सबको दर्शन लेने दो या त्यांच्या प्रचलित वाक्यसमुहांचा मुबलक वापर होत होता. इकडे पुजार्‍यांनी भाविकांचा हार-फुलादी 'भक्तीभाव' पिंडीवर वाहिल्यानंतर तो तत्परतेने उचलून दुसरीकडे टाकण्याचा व्यवहार्यभाव पाहणारी पुजार्‍यांची दुसरी फळी मंदिराच्या मुख्य खोलीत कार्यरत होती.

मंदिरात इतरांसाठी प्रवेश निषिद्ध असला तरी काही मंडळी मात्र आत दिसत होती. त्यांची 'उंची' कपड्यांतून, आचरणातून, व्यवहारातून नि अनेक बाबींतून कळत होती. आमच्या जत्थ्यातल्या काकूंचा भलताच हिरमोड झाला होता. त्यांना आत जाऊन देवदर्शन करायचे होते. पण ते शक्य नव्हते. आम्ही इतर अनेकांप्रमाणे आत शिरता येईल काय याची चाचपणी केली परंतु, त्यातून दुर्लक्ष करणे, धुत्कारणे, झिडकारणे या वृत्तींची नवी उदाहरणे कळाली.

तेवढ्यात देवाची आरती झाल्याची वार्ता कापराच्या वासाने दिली. सहाजिकच ती आरती घ्यायला लोकांची गर्दी झाली. दुसर्‍या थाळीत प्रसादही होता. जत्थ्यातल्या आमच्या एका सौभाग्यवतीच्या चिमुकल्या चिरंजीवाने त्या थाळीतील वाटपासाठीच चालवलेला प्रसाद स्वहस्ते उचलला नि मग कपाळावरची उजवी शिर तडतडून पुजार्‍याने 'देवाघरची फुले' असलेल्या त्या मुलाच्या मातेला 'पुत्रसंस्काराचे' धडे दिले. तेवढ्याशा त्या शाब्दिक माराने त्या मातेला अश्रू आवरेनासे झाले.

अखेरीस लांबून का होईना दर्शन पार पडल्यानंतर जत्था सभागृह मंडपातून बाहेर पडला. बाहेरही अनेक मंदिरे थाटलेली होती. ही मंदिरे बर्‍यापैकी ऐसपैस जागेत होती. त्यात एक मंदिर विठ्ठलाचेही होती. तिथे आल्यानंतर आजूबाजूला मराठी आवाज तेवढे ऐकू आले. बाकी मंदिरातही बरीच गर्दी होती. इथून सगळी दर्शने करून आमचा जत्था अखेरीस मंदिराच्या बाहेर पडला.

दर्शन करूनही ते जवळून न झाल्याने काकूंचा झालेला हिरमोड चेहर्‍यावर दिसत होताच. सहलसंयोजकाने इच्छामणी गणपतीचे दर्शन आधी घेतले असते तर थेट आतपर्यंत जाऊन दर्शन घेता आले असते. आपण आधी इथे यायला नको होते, अशी पश्चातभावना व्यक्त केली. आणि मग हा सगळा जत्था इच्छामणीच्या दर्शनाला गेला. तिकडून मग मंगलनाथ, भैरवनाथ अशी मंदिरे करत संध्याकाळपर्यंत उज्जयिनी नगरिला प्रदक्षिणा घालत पुन्हा महांकालेश्वराच्या प्रांगणात अवतरला. तिथे गेल्यानंतर मंदिरात गर्दी नसल्याची सुखद वार्ता कळली. तातडीने सगळ्यांनी मंदिराकडे धाव घेतली.

आता सगळी सर्पिलाकार वेटोळी मिटली होती. प्रवेश केल्यानंतर कुठेही न थांबताच सगळी मंडळी थेट मंदिराच्या आत जाऊन पोहोचली. पायीची वाट थेट महांकालेश्वराच्या गाभार्‍यातच पोहोचली. समोर महांकालेश्वराचे शिवलिंग. त्याच्याभोवती योनीपटल. सर्पाने छानपैकी फणा पसरलाय. आणि त्या सगळ्यावर पुजारीवर्ग डोलतोय. असा सारा माहौल होता. आतले दृश्य अगदी रमणीय होते. काही भाविकांनी पिंडीलाच मिठी मारली होती. काहींनी भक्तीभावाने पिंडीजवळ डोके ठेवले होते. हलवल्याशिवाय ते वर उचलण्याची तसदी ते अजिबात उचलत नव्हते. काही जण आणलेल्या वस्तू वाहत होते. काही जण अभिषेकाला बसले होते. काही जप करत होते. प्रत्येकाच्या भक्तीभावनेला तोंड फुटले होते.

गर्भगृहात मोजकीच मंडळी होती. पण पुजारी मंडळी आपले अस्तित्व विसरू देत नव्हती. दक्षिणांच्या नोटेवरून त्यांचे आवाज ठरत होते. काहींचे अभिषेक त्यांच्या मार्फत सुरू होते. त्याच्या मंत्राचे आवाज येत होते. काही जणांनी मध्यस्थाविना पुजा चालवली होती. काही जप करत होते. आमच्या जत्थ्यातल्या काकू महांकालेश्वराचे रूप पाहून हरखून गेल्या होत्या. पुजार्‍यांचे आवाज ऐकल्यानंतर त्यांनी शंभराची नोट काढली नि वाहिली. ती नोट नि हातातली जपाची माळ पाहताच पुजारीबुवांनी त्यांना जपासाठी वेगळी जागा उपलब्ध करून दिली. त्यांचा जप सुरू झाला. आम्ही निवांतपणे दर्शन घेतले. पुजारी बुवांची पुजा चालली होती. लोक येत होते. दर्शन घेत होते.

आता गर्दी खूपच कमी झाली होती. सगळ्यांची दर्शने आटोपली होती. काकूंचा जप संपला होता. निश्चिंत नि निवांत भावाने त्या जप आटोपून पिंडीसमोरच्या मोकळ्या जागेत बसल्या. दर्शनाने त्या तृप्त झाल्या होत्या. सहल संयोजकाने आठवण करून दिली, 'यह इच्छामणीका प्रसाद है. उसका दर्शन लिया और महांकालेश्वरके अच्छे दर्शन हो गए.' त्याच्या म्हणण्याला उगाचच होकार भरत आम्ही त्याच्या चेहर्‍यावरच्या तृप्त गोलाई वाढवली. दर्शन झाले. दिवसभराची कटकट, तगमग, वसवस, तडतड अशा अनेक द्वि दुरूक्त शब्दांच्या भावनांचा अंत 'याचसाठी केला होता अट्टाहास' या भावनेने झाला ही समाधानानाची बाब.

इत्यलम.