मराठ्यांना नर्मदेपलीकडे नेऊन उत्तर दिग्विजय करणारा वीर म्हणून पहिल्या बाजीराव पेशव्यांचे नाव आदराने घ्यावे लागेल. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याचा पाया रचला आणि बाजीरावांनी त्यावर कळस चढविला असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. दक्षिणेतील श्रीरंगपट्टणपासून संपूर्ण मध्य आणि उत्तर भारत बाजीरावाने मराठ्यांच्या घोड्यांच्या टाचेखाली आणला. राजपूत राजांपासून मुस्लिम नबाब आणि शाह्यांना या रावबाजीने नमवले मराठी जरीपटका डौलात उत्तर हिंदुस्तानात फडकविला.
बाजीरावाचा जन्म भाद्रपद शुक्ल पौर्णिमा शके १६२२ अर्थात १८ ऑगस्ट १७०० साली झाला. पहिले पेशवे बाळाजी बाजीराव हे बाजीरावाचे पिता. वडिलांच्या सानिध्यात बाजीराव बरेच काही शिकला. शिपाई गडी करण्याची खुमखुमी त्याच्यात लहानपणापासूनच होती. म्हणूनच बाळाजी बाजीरावावर दिल्लीच्या बादशहाची भेट घ्यायला गेले तेव्हा अवघ्या १९ वर्षाचा बाजीही त्यांच्याबरोबर होता. उत्तर हिंदुस्थानात मराठी सत्तेला हातपाय पसरायच्या किती शक्यता आहे, याचा अदमास त्या कोवळ्या वयातच बाजीने घेतला होता. दुर्देवाने त्यानंतर लगेचच बाळाजी बाजीरावांचा मृत्यू झाला नि पेशवेपदाची सुत्रे बाजीरावाच्या हातात आली. पण हे इतके सहज घडले नाही. शाहू महाराजांच्या दरबारी मंडळींचा बाजीरावाला विरोध होता. पण शाहूंनी त्यांचे न ऐकता बाजीरावाला या पदाची शिक्के नि कट्यार सोपवली. शाहूंचा हा निर्णय बाजीनेही सार्थ ठरवला.
वयाच्या विसाव्या वर्षी पेशवेपद मिळवलेला हा पेशवा वयाच्या चाळिसाव्या वर्षी मध्य प्रदेशातील नर्मदेकिनारी असलेल्या रावेरखेडी येथे मरण पावला. पण या वीस वर्षाच्या पेशवेपदाच्या कारकिर्दीत त्याने 'अतुलनीय' पराक्रम केला. या काळात त्याने एकूण ३० ते ३५ लढाया खेळल्या आणि त्या सर्व जिंकल्याही. त्यातल्या २१ तर मोठ्या लढाया होत्या. लढाईत शंभर टक्के यश मिळविणारा आणि एकही लढाई न हारणारा हा एकमेव वीर आहे.
बाजीने माळवा, निमाड प्रांत ताब्यात घेतला. गुजरातमध्येही धडक मारली. पुढे आणखी उत्तर हिंदुस्तानात पसरण्याची संधीही त्याला मिळाली. बुंदेलखंडाचा राजा छत्रसाल यावर दिल्लीच्या बादशहाचा वजीर फरीदाबादच्या बंगश पठाणांनी हल्ला चढवून त्याला कैद करून ठेवले. छत्रसालाने बाजीला पत्र लिहून "जो गति ग्राह गजेंद्र की सो गति भई जानहु आज॥ बाजी जात बुंदेल की राखो बाजी लाज॥ असा "गजांतमोक्षाचा" हवाला देउन बाजीरावाकडे मदतीची याचना केली. पत्र मिळाल्यावर टाकोटाक ३५-४० हजारांची फौज घेउन खुद्द बाजीराव, मोहम्मद खान बंगेशवर चालून गेला. ही हालचाल इतकी त्वरेने केली की बाजीराव धडकेपर्यंत मोहम्मद खान बंगेशला काहीच समजले नाही. बेसावध बंगेश एका गढीत अडकला. बाजीरावाच्या झंजावातापुढे मोगल हैराण झाले.
छत्रसालाने यानंतर बाजीरावाच्या पराक्रमावर खुष होऊन आपल्या उपपत्नीपैकी एकीची मुलगी 'मस्तानी' बाजीरावाला दिली. तीही रितसर लग्न लावून. मराठी इतिहासात पेशवाईचा उल्लेख करताना बाजीरावाचे नाव येते. पण का कुणास ठाऊक त्याच्या पराक्रमाचे योग्य दान त्याच्या पदरात टाकले गेले नाही. अतुलनीय पराक्रम गाजवूनही तो उपेक्षित राहिल्यासारखाच वाटतो. मस्तानी हे कदाचित त्याचे कारण असावे. हिंदू जोधाबाईला पत्नी करून घेणारा सम्राट अकबर सर्वत्र चर्चिला जातो, पण एका मुस्लिम (?- मस्तानी ही प्रणामी पंथाची होती, ज्यात हिंदू व मुस्लिम यांची मिश्र उपासना पद्धत आहे.) बाईला कायद्याने पत्नी म्हणून घरी आणणारा आणणारा बाजीराव मात्र उपेक्षित ठरविला जातो हे दुर्देव आहे.
बाजीरावाची आपण उपेक्षा केली तरी जगाच्या इतिहासात मात्र तो तितका उपेक्षित राहिला नाही. म्हणूनच अ कन्साईज हिस्ट्री ऑफ वॉरफेअर या युद्धशास्त्रावर आधारीत ग्रंथात फिल्ड मार्शल मॉंटगोमरी यांनी जगातील सात लढायांचा उल्लेख केला आहे. त्यात पालखेड (वैजापूर-औरंगाबादजवळ) येथील लढाईचा उल्लेख आहे. या लढाईत बाजीने निजामाला पाणी पाजले. या लढाईत अतिशय वेगवान हालचाल करून बाजीने निर्णय घेतले आणि निजामाला दाती तृण धरायला लावले. याशिवाय नादिरशहाला पराभूत केले ती लढाईसुद्धा त्याच्या अद्वितीय पराक्रमाची साक्ष देणारी आहे. १७३९ मध्ये नादिरशहाने दिल्लीClick here to see more news from this city लुटली. बाजीरावाने चंबळच्या खोर्यात आणले आणि चक्क लढाई न करताच शत्रूचे सैन्य परत गेले. बाजीरावाकडे योजना आखण्याची बुद्धी होती आणि तिची अंमलबजावणी करण्यासाठी हात होते, हे इंग्रज इतिहासकार ग्रॅंट डफनेही लिहून ठेवले आहे.
बाजीरावाच्या लढाईची अनेक वैशिष्ट्ये आहेत. तो एक चांगला सेनापती होता. युद्ध कसे लढावे आणि कुठे लढावे याचे यथायोग्य ज्ञान त्याच्याकडे होते. घोडेस्वारांचे पथक हे त्याचे मुख्य बळ होते. त्याच्या शिस्तबद्ध फौजा ७५ किलोमीटर प्रती दिन या वेगाने जायच्या. त्यांच्याबरोबर सामान अगदीच कमी असे. महिला नव्हत्या. रात्री झोपण्यापेक्षा जास्त हल्ला कसा करायच्या याच्या योजना ठरत. शत्रूची रसद तोडणे आणि त्याला होणारा सगळा पुरवठा तोडणे यावर भर दिला जाई. स्वतः बाजीराव घोड्यावरच झोप घेई. त्यावरच तो जेवण करत असे.
पुण्याचा शनिवारवाडाही बाजीरावानेच बांधला. पुण्यातून हललेले मराठी सत्तेचे केंद्र त्यानेच कोल्हापुरातून आणून पुण्यात वसविले. हिंदूस्थानभर आपल्या नावाचा धाक बसविणारा बाजीराव घरच्या कारवायांना मात्र तोंड देऊ शकला नाही. मस्तानीवर त्याने अफाट प्रेम केले तरी पुण्यातल्या तत्कालीन ब्रह्मवृंदाला, त्याच्या आईला आणि बंधू चिमाजी अप्पांना ते काही पटले नाही. मस्तानीपासून त्याल समशेरबहाद्दर नावाचा मुलगाही झाला. घरच्या कारवायांनी सतत वैतागलेला बाजी लढाईच्या मोहिमांवरच राहू लागला. याच वातावरणात २७ फेब्रुवारी १७४० रोजी नासिरजंग विरुध्द जिंकून मुंगीपैठण येथे तह झाला. तहात नासिरजंगने हंडिया व खरगोण हे बाजीरावांना दिले. त्याचीच व्यवस्था लावण्यासाठी ३० मार्च रोजी बाजीराव खरगोणला गेले. या स्वारीत अचानक प्रकृती बिघडून मध्य प्रदेशातील खांडवा- इंदूर मार्गावर असलेल्या सनावदजवळ नर्मदा नदीच्या किनारी रावेरखेडी येथे २८ एप्रिल १७४० (वैशाख शुध्द शके १६६२) रोजी पहाटे हा महापराक्रमी पेशवा विषमज्वराने मरण पावला. मृत्यूवेळी तो अवघ्या चाळीस वर्षांचा होता.
'जीवाची बाजी लावणे' हा वाक्प्रचार आपल्या कर्तृत्वाने जन्माला घालणार्या या महान योध्याला सलाम.
Sunday, September 20, 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment